सामाजिक कार्याचा दिला आदर्श पाठ ! फणसवाडीतील मित्रमंडळींनी डागडुजी करून स्वच्छ केला वैकुंठघाट
उरण, दि.३१(विठ्ठल ममताबादे): आपला गाव म्हणजे एक दागिना आहे त्याला स्वच्छ ठेवणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून केली तर बदल घडायला वेळ लागत नाही. स्वच्छ गाव सुंदर गावं, माझं गावं ह्या संकल्पनेतून प्रेरणा घेत उरण तालुक्यातील पिरकोन गावातील फणसवाडी सेक्टर ११ येथील फणसवाडी मैत्री कट्टाच्या सर्व मित्र मंडळींच्या श्रमदानातून आणि स्वखर्चातून पिरकोन गावातील वैकुंठघाट (स्मशान घाट) या घाटावरच्या चिता पेटवायच्या पोलादी खांबांच्या खालच्या ढासळलेले अवस्थेतील पिलर्स आर.सी.सी. काँक्रीटचे बांधकाम करून त्याची डागडुजी करण्यात आली तसेच बसण्यासाठीच्या सभामंडपाला रंगरंगोटी करून वैकुंठधाम नावाचे फलक लावण्यात आले. सोबतच एक खास कार्य केलं गेलं ते म्हणजे स्मशानभूमीत प्रेताग्नी नंतर दहन होऊन अस्तिमिश्रित शिल्लक राहिलेली राख ही तशीच साचून राहिलेली असते आणि तीच किमान चार छोटे टेम्पो भरून ती राख समुद्राच्या पाण्यात सोडून विसर्जित करण्यात आली आणि अस्थीघाट स्वच्छ करण्यात आला. सोबतच पिरकोन गावातील वैकुंठघाट (स्मशानघाटाच्या) आजूबाजूचा संपूर्ण परिसर फणसवाडी, सेक्टर ११ येथील फणसवाडी मैत्री कट्टाच्या माध्यमातून स्वच्छ करण्यात आला.

संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटलं आहे, “आम्हीं जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा !!..” कारण असं म्हटलं जातं कि जेथे आयुष्याचा शेवट हा साडे तीन हातांच्या भूमीवर होतोय आणि त्याच वैकुंठ भूमीच्या डागडुजीच्या कामाचा आदर्श फणसवाडी मैत्री कट्टाच्या पदाधिकारी सदस्यांनी सर्वांसमोर ठेवला आहे. सामाजिक दायित्व जपत फणसवाडी मैत्री कट्टा सेक्टर ११ यांच्या माध्यमातून स्वखर्चातून व श्रमदानातून साकारलेल्या ह्या प्रेरणादायी सत्कार्यात सुरेशदादा गावंड, सरपंच रमाकांतजी जोशी, माजी सरपंच मंगेश भाई म्हात्रे, हरिश्चंद्र गावंड, अनंता गावंड, काशिनाथ गावंड, सुनिल घरत, अनिल घरत, राजेंद्र जोशी, प्रमोद जोशी, यातिश गावंड, प्रितम गावंड, प्रदीप गावंड, विलास पाटील, सुजित पाटील(सत्ता ), समाधान पाटील, सागर पाटील, मयूर पाटील, केतन गावंड, सतिश म्हात्रे, प्रतिक घरत, निशाल गावंड, दिलेश गावंड, धनाजी पाटील, मनोहर गावंड, जयवंत गावंड संतोष गावंड, संतोष जोशी, यज्ञेश गावंड, रुपेश पाटील, संतोष पाटील आदी मान्यवरांनी सहभाग घेतला. सामाजिक बांधिलकी जपत निस्वार्थी भावनेने केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
