शिवडी–न्हावा सागरी सेतूला बॅ. ए. आर. अंतुलेंचे नाव द्यावे – काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची मागणी
उरण, दि.१९(प्रतिनिधी): खऱ्या अर्थाने कोकणचा विकास ज्यांच्यामुळे झाला असे कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री बॅ. ए. आर. अंतुले साहेब यांचे नाव न्हावा–शिवडी सागरी सेतूला देण्यात यावे अशी मागणी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. रायगड व कोकणात उद्योगधंदे आणून हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला. कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीचे नाव रायगड जिल्हा असे केले. असे अनेक धाडसी निर्णय बॅरिस्टर ए. आर. अंतुले घेतले. बॅरिस्टर अंतुले हे फक्त रायगड पुरते मर्यादित नव्हते तर ते राष्ट्रीय नेते होते. अशा राष्ट्रीय नेत्याचा उचित सन्मान व्हावा व त्यांचे नाव अजरामर व्हावे या हेतूने महेंद्र घरत यांनी हि मागणी केली आहे. या मागणीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी समर्थन देत महेंद्र घरत यांच्या मागणीचा विचार व्हावा असे पत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहेत.
