मच्छीमार कृती समितीने उठवला आवाज
उरण, दि.१४(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील नागाव-पिरवाडी येथील समुद्र किनाऱ्यावर मोठया प्रमाणात तेल आल्याने स्थानिक मच्छीमारांचे नुकसान होऊन उदरनिर्वाहाचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नागाव-पिरवाडी मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष भूपेश कडू यांनी आवाज उठवला आहे. शासनाच्या विविध विभागात शासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून निवेदन देऊन सदर समस्या त्वरित सोडविण्याची मागणी त्यांनी केली.
उरण तालुक्यातील नागाव पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर गेल्या तीन दिवसांपासून प्रचंड प्रमाणात तेल सर्वत्र पसरल्यामुळे नागाव पिरवाडी येथील स्थानिक मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाळ्यात चार महिने मासेमारी बंद असते. स्थानिक मच्छिमार आता कुठे मासेमारीला सुरवात करतात त्यामध्येही तेल आल्याने मच्छिमारांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. समुद्र किनाऱ्यावर सातत्याने तेल येत असल्याने स्थानिक मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परंतु कुठल्याही प्रकारे नुकसान भरपाई स्थानिक मच्छिमारांना मिळत नाही.

नागाव-पिरवाडी, तालुका-उरण, जिल्हा-रायगड येथे ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनी(ONGC) हा राष्ट्रीय प्रकल्प कार्यरत असल्याने तेल सातत्याने समुद्रात येत असते त्यामुळे स्थानिक मच्छिमार त्रस्त झाले आहेत. कंपनी कडून स्थानिक मच्छिमारांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही. नागाव पिरवाडी येथील समुद्र किनाऱ्यावर आलेल्या तलाची पाहणी करून स्थानिक मच्छिमारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नागाव पिरवाडी मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष भूपेश कडू व स्थानिक मच्छिमार, ग्रामस्थांनी तहसलीदार, पंचायत समिती उरण, नागाव ग्रामपंचायत, स्थानिक आमदार महेश बालदी, सहाय्यक आयुक्त अलिबाग , परवाना अधिकारी उरण यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
नागाव पिरवाडी येथे समुद्र किनारी ऑइल नॅचरल गॅस कंपनी(ONGC)चा प्रकल्प असल्याने नागाव पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर तेल सातत्याने समुद्रात येत असल्यामुळे आम्ही स्थानिक मच्छिमार त्रस्त झालो आहोत. समुद्रात तेल आल्यामुळे काही काळ आम्हा मच्छिमारांना मासेमारी करता येत नाही व ONGC कंपनी कडून स्थानिक मच्छिमारांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांना नुकसान भरपाई मिळावी व पुनर्वसन करून ONGC कंपनी मध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा ही मागणी नागाव पिरवाडी मच्छिमार कृती समितीचे माझ्यासह जगदीश कडू, मनोज घरत, मनोज कडू, मंगेश थळी, सुनंदा कडू, रुपेश थळी, रविंद्र कडू व समितीचे कार्यकर्ते आणि स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
-भूपेश कडू
अध्यक्ष-नागाव पिरवाडी मच्छिमार कृती समितीपिरवाडीच्या समुद्र किनारी ऑइल भरपूर प्रमाणात आले आहे. आणी त्यातच पिरवाडीच्या तरुण युवकांना कामधंदा नसल्यामुळे पोट पाणी मच्छिमारीवर चालतोय. आणी ऑइल आल्यामुळे मच्छिचे जाळे खराब झाले आहेत. शिवाय तेलामुळे समुद्रात मासे मिळणेही मुश्किल झाले आहे. तरी प्रशासनाने लक्ष घालून मच्छिमारांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रशासनाकडे आम्ही करत आहोत.
– मनोज कडू, ग्रामस्थ
झालेल्या नुकसानीबाबत पुढील कार्यवाहिसाठी ओ.एन.जी.सी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधणार आहे व मच्छिमारांना न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
– भाऊसाहेब अंधारे
तहसीलदार, उरण
