“‘समृद्धी’च्या कामावरील अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणार” – सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. ४: ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना गर्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेचे विश्लेषण तांत्रिक तज्ज्ञांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. समृद्धी महामार्गाच्या कामांमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेबाबत दक्षता घेण्यात येत आहे. भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी दक्षता घेण्यात येत असून अधिक सुरक्षितता घेण्यासाठी आवश्यक ठोस उपाययोजना करण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत सांगितले. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना गर्डर कोसळून झालेल्या अपघाताबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री भुसे म्हणाले की, ही दुर्देवी घटना अपघाताने झाली आहे. या दुर्घटनेसंदर्भात पोलीस तपास सुरु आहे. राज्य शासनातर्फे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये व केंद्र शासनाने प्रत्येकी दोन लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे. मूळ कंत्राटदार यांच्याकडून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत तसेच उपकंत्राटदार यांच्याकडून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य ॲड. अनिल परब, एकनाथ खडसे, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.
