राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ
सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा एकदा जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ठरल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं सुरु झालं. त्यावेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना ते बोलत होते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ७ महिन्यांमध्ये देशात ४८ अब्ज डॉलर्सची परदेशी गुंतवणूक झाली असून देशाच्या विकासावर जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास असल्याचं ते म्हणाले.
देशाच्या कोविड लसीकरण कार्यक्रमानं या महामारीच सामना करण्यासाठी आपण सक्षम असल्याचं सिद्ध केलं असून एक वर्षांहूनही कमी काळात देशानं १५० कोटी पेक्षा जास्त लस मात्रा देण्याचा टप्पा ओलांडल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या ९० टक्क्याहून जास्त पात्र नागरिकांना कोविड लसीची पहिली मात्रा मिळाली असून ७० टक्क्याहून जास्त नागरिकांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचं ते म्हणाले. सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास आणि सबका प्रयास हा सरकारच मंत्र असून पुढील २५ वर्षांसाठी मजबूत पाया तयार करण्याच्या दृष्टीनं आपलं सरकार काम करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
कोरोना संकटाचा सामना देशानं मोठ्या धैर्यानं केला असून या काळात सूक्ष्म आणि लघु उद्योगांना वाचवण्याचे सरकारचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं. आत्मनिर्भर भारताचं लक्ष्य गाठण्यासाठी सरकारनं मेक इन इंडियाला प्राधान्य दिलं असून स्टार्टअप उद्योगांमुळे देशात मोठा रोजगार उपलब्ध झाल्याचं ते म्हणाले. देशाच्या आर्थिक स्थितीनं गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण केला असून देशात परदेशी गुंतवणुकीचा ओघ सातत्यानं सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्र अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग असल्याचं ते म्हणाले. २०२०-२१ या वर्षात देशाच्या कृषी क्षेत्रात २५ टक्के वृद्धी झाली असून पीक विमा योजनेचा लाभ ८ कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना झाल्याचं त्यांनी सांगितलं.
प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य सुविधा अभियानामुळे केवळ सध्याच्या आरोग्य विषयक गरजा पूर्ण झाल्या नसून पुढे येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी देशाला तयार केल्याचं ते म्हणाले. देशातल्या गरीब आणि वंचित जनतेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असून सरकारच्या संवेदनशील धोरणांमुळे देशातल्या सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
पहिल्यांदाच राज्यसभेत शून्य प्रहर एक तासाऐवजी अर्ध्या तासाचा करण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र सरकारनं आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सर्वपक्षीय बैठक दुपारी ३ वाजता बोलावली आहे. राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी कामकाजाचे विषय ठरवण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांची संध्याकाळी पाच वाजता दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक बोलावली आहे.
Source-AIR
