दुसऱ्या इंनिंग मध्ये पडणाऱ्या पावसामुळे राज्यातल्या बहुतांश धरणांमधून विसर्ग सुरु
मुंबई, दि. २५: मोसमी पावसाच्या दुसऱ्या इंनिंग मध्ये राज्यात सर्वत्र दमदार पाऊस पडतोय. धरणक्षेत्रातही मुसळधार वर्षा होत असल्यामुळे बहुतांश धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरणातून ८ हजार ४२८ क्युसेक, दारणा धरणातून १४ हजार ४१६, नांदूर मधमेश्वरमधून ५२ हजार ३०८ तर पालखेड धरणातून कादवा नदीमध्ये ८३० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नाशिक शहरात मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. नदीच्या इशारा पातळीपर्यंत पाणी आल्याने नाशिक महापालिकेने नदीकाठच्या नागरिकांना तातडीनं स्थलांतरित होण्याचं आवाहन केलं आहे. सुरगाणा तालुक्यात मौजे बोरचोंड इथं मुसळधार पावसामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत. धरणातून ७ हजार २१२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नंदुरबार जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे विरचक्क धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. गेली दोन वर्ष दुष्काळामुळे रिकाम्या असलेल्या विरचक्क धरणातून दोन वर्षानंतर पाणी सोडलं जाणार असल्याने शीवन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धुळे जिल्ह्यात पांझरा नदीवरच्या अक्कलपाडा प्रकल्पाच्या धरणातून आज दुपारपर्यंत १५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पांझरा नदीला पूर आला आहे. नदीच्या पुरात एक तरुण वाहून गेला आहे. भात नदीला पूर आल्यानं तिसगाव धंदाणे गावाचा पूल पाण्याखाली गेला असून संपर्क तुटला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असल्याने धरणातलं अतिरिक्त पाणी धावरी नदीत सोडलं जाईल, असं नवी मुंबई महानगरपालिकेने सांगितलं आहे. त्यामुळे धावरी आणि पाताळगंगा नदीजवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पालघर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. सततच्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
Source – AIR
