रायगड जिल्ह्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षकाविरुद्ध खंडणीच्या गुन्ह्यात वॉरंट
उरण, दि. २५(विठ्ठल ममताबादे): ऑइल टूल्स इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे तत्कालीन संचालक सुशील कुमार मेहता यांनी मे २०१९ मध्ये अजित वेणुगोपाल, सजित वेणुगोपाल, कुनिमल वेणुगोपाल आणि गोपकुमार कट्टू यांच्या विरोधात पोलिसांत खोटी तक्रार/एफआयआर दाखल केली होती. सुशील कुमार मेहता (रा. डेहराडून) याने स्थानिक रहिवासी नीलेश वसंत पाटील (रा. माडप गाव) यांच्यासोबत कट रचून खालापूर पोलीस ठाण्यात खोटी तक्रार/एफआयआर दाखल केला.
तत्कालीन पोलीस तपास अधिकारी जमील अहमद शेख (सध्या सी. बी. डी. बेलापूर येथे कार्यरत आहे) आणि पोलीस कॉन्स्टेबल सागर शेवटे (सद्या खोपोली येथे कार्यरत आहे) यांच्या मदतीने सुशील कुमार मेहता आणि नीलेश वसंत पाटील यांनी अजित वेणुगोपाल आणि सजीत वेणूगोपाल यांच्याकडून बळजबरी आणि कट रचून पोलिस निरीक्षक जमील अहमद शेख यांच्या चेंबरमध्ये करार करून घेतला. कराराद्वारे त्यांनी वेणुगोपाल कुटुंबीयांकडून कंपनीतील त्यांच्या नावे असलेली मालमत्ता आणि एक कोटी रुपयांचा धनादेश बळजबरीने काढून घेतला. पुढे सुशील कुमार मेहता, नीलेश वसंत पाटील यांनी पुन्हा एकदा सजित वेणुगोपाल यांच्याकडे पोलीस निरीक्षक जमील अहमद शेख यांच्या कार्यालयात खरसुंडी गावात त्यांच्या कुटुंबाची ३ एकर जमीन देण्याची मागणी केली. पुढे सुशील कुमार मेहता आणि वरील लोकांनी राज कुमार कश्यपच्या (रा. डेहराडून) सेवांचा वापर करून दिल्लीत वेणुगोपाल कुटुंबातील सदस्यांविरुद्ध खोटी कागदपत्रे आणि खटले दाखल केले.
हे सर्व अत्याचार असह्य झाल्याने सजीत वेणूगोपाल यांनी सुशीलकुमार मेहता आणि त्याचे साथीदार नीलेश वसंत पाटील, राजकुमार कश्यप, पोलिस निरीक्षक जमील शेख आणि पोलिस हवालदार सागर शेवते यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी वाशी न्यायालयासमोर खंडणीची याचिका दाखल केली. वाशी न्यायालयाच्या निर्देशानुसार Cr.P.C. 202 च्या अंतर्गत वाशी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर, आरोपी जमील अहमद शेख, सुशील कुमार मेहता, नीलेश वसंत पाटील, सागर शेवते, राज कुमार कश्यप आणि इतरांवर I.P.C. च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करणारा चौकशी अहवाल वाशी पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी वाशी न्यायालयासमोर दाखल केला होता. वाशी पोलीस स्टेशन आणि तक्रारदार यांनी दाखल केलेल्या चौकशी अहवालाची पडताळणी पूर्ण केल्यावर वाशी न्यायालयाला आरोपी सुशील कुमार मेहता आणि इतरांविरुद्ध कलम ३४२, ३८६, ४२०, ४६७, ४६८ आणि ४७४ I.P.C. अन्वये शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्यांसाठी पुरेशी कारणे असल्याचे आढळून आले आहे. दिनांक २१ मे २०२२ च्या आदेशानुसार, वाशी न्यायालयाने सर्व आरोपींना समन्स जारी करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. तसेच सदर तक्रारी अर्ज वॉरंट केस म्हणून नोंदवण्याचे निर्देश दिले गेले आहेत. वेणुगोपाल कुटुंबाच्या वतीने ऍड. कर्मराज आर. दुबे यांनी कामाची देखरेख केली.
