श्रीमूर्ती विसर्जनासाठी तराफ्यांवरून जलाशयात जात आयुक्तांनी दिले स्वयंसेवकांना प्रोत्साहन
नवी मुंबई, दि. २४: गौरीच्या आगमनानंतर वेगळ्याच उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाचा गौरी गणपती विसर्जन सोहळा अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात निर्विघ्नपणे पार पडला. नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व विसर्जन स्थळांवर केलेल्या सुनियोजित व्यवस्थेमध्ये २२ नैसर्गिक आणि १४१ कृत्रिम विसर्जन स्थळांवर एकूण १९०८४ श्रीगणेशमूर्तींचे तसेच २२३८ गौरींचे विसर्जन संपन्न झाले.
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी काही विसर्जन स्थळांना भेट देत व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. विशेष म्हणजे सेक्टर ६, वाशी येथील मध्यवर्ती विसर्जन तलावाठिकाणी आयुक्त स्वयंसेवकांसमवेत तराफ्यावरुन श्रीगणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी जलाशयात गेले. आयुक्त स्वतःहून श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी तराफ्यावरून तलावात आले व आम्हांला प्रोत्साहित केले याचा आनंद तेथील स्वयंसेवकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. आयुक्तांनी स्वयंस्फूर्तीने केलेल्या या कृतीची सर्व स्तरांतून प्रशंसा करण्यात येत आहे.
या पाहणीप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व विजयकुमार म्हसाळ, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ १ उपायुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ २ चे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार तसेच इतर महापालिका अधिकारी, विभाग अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
सर्व विसर्जन स्थळांवर ठेवलेल्या चोख व्यवस्थेमध्ये २२ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर १४०७७ घरगुती तसेच २३८ सार्वजनिक मंडळांच्या एकूण १४३१५ श्रीमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच १४१ कृत्रिम विसर्जन स्थळांवर ४७३६ घरगुती तसेच ३३ सार्वजनिक मंडळांच्या ४७६९ श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. अशा प्रकारे १८८१३ घरगुती व २७१ सार्वजनिक मंडळांच्या एकूण १९०८४ श्रीमूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले. याशिवाय नैसर्गिक २२ विसर्जन स्थळांवर १४०४ गौरींचे आणि १४१ कृत्रिम विसर्जन स्थळांवर ८३४ गौरींचे अशाप्रकारे एकूण २२३८ गौरींचे विसर्जन व्यवस्थितरित्या पार पडले.

यामध्ये बेलापूर विभागात ५ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर २२९० घरगुती व ४९ सार्वजनिक तसेच १९ कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये ४२५ घरगुती व १० सार्वजनिक श्रीगणेशमूर्तींचे त्याचप्रमाणे नैसर्गिक विसर्जन तलावांवर १३१ व कृत्रिम विसर्जन तलावांवर ४८ गौरींचे विसर्जन करण्यात आले. नेरुळ विभागात २ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर १९०० घरगुती व ३० सार्वजनिक तसेच २६ कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये ६२२ घरगुती व ४ सार्वजनिक श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. त्याचप्रमाणे नैसर्गिक विसर्जन तलावांवर १९४ व कृत्रिम विसर्जन तलावांवर १५७ गौरींचे विसर्जन करण्यात आले.
वाशी विभागात २ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर ९६१ घरगुती व २० सार्वजनिक तसेच १६ कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये ४४६ घरगुती श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्याचप्रमाणे नैसर्गिक विसर्जन तलावांवर ४९ व कृत्रिम विसर्जन तलावांवर ५३ गौरींचे विसर्जन करण्यात आले. तुर्भे विभागात ३ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर ८८६ घरगुती व १४ सार्वजनिक तसेच १७ कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये ६२६ घरगुती व १२ सार्वजनिक श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन झाले. त्याचप्रमाणे नैसर्गिक विसर्जन तलावांवर १०१ व कृत्रिम विसर्जन तलावांवर ९१ गौरींचे विसर्जन करण्यात आले.
कोपरखैरणे विभागात २ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर २२४३ घरगुती व १० सार्वजनिक तसेच १५ कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये १०५२ घरगुती व १ सार्वजनिक श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. त्याचप्रमाणे नैसर्गिक विसर्जन तलावांवर ३७४ व कृत्रिम विसर्जन तलावांवर ३७५ गौरींचे विसर्जन करण्यात आले. घणसोली विभागात ४ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर ३०९३ घरगुती व ६१ सार्वजनिक तसेच २१ कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये ५७२ घरगुती श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्याचप्रमाणे नैसर्गिक विसर्जन तलावांवर ४३७ गौरींचे विसर्जन करण्यात आले.
ऐरोली विभागात ३ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर १७१४ घरगुती व १९ सार्वजनिक तसेच १८ कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये ७७६ घरगुती व ६ सार्वजनिक श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन संपन्न झाले. त्याचप्रमाणे नैसर्गिक विसर्जन तलावांवर ७९ व कृत्रिम विसर्जन तलावांवर ९४ गौरींचे विसर्जन करण्यात आले. दिघा विभागात १ नैसर्गिक विसर्जन स्थळावर ९९० घरगुती व ३५ सार्वजनिक तसेच ९ कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये २१७ घरगुती श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले.त्याचप्रमाणे नैसर्गिक विसर्जन तलावांवर ४९ व कृत्रिम विसर्जन तलावांवर १६ गौरींचे विसर्जन करण्यात आले.
अशाप्रकारे संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १६३ विसर्जन स्थळांवर १८८१३ घरगुती व २७१ सार्वजनिक अशा १९०८४ श्रीगणेशमूर्तींना व २२३८ गौराईंना भक्तीपूर्ण निरोप देण्यात आला. गौरीसह विसर्जित होणाऱ्या श्री गणेशमूर्तींची संख्या मोठी असते हे लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्व विसर्जन स्थळांवर अधिक चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. स्वतः महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर तसेच दोन्ही अतिरिक्त आयुक्त, दोन्ही परिमंडळाचे उपायुक्त आणि सर्व विभागप्रमुख विविध विसर्जन स्थळांवरील व्यवस्था बारकाईने पाहत होते.
नैसर्गिक जलस्त्रोतांच्या शुध्दतेसाठी श्रीमूर्तींचे विसर्जन करताना कृत्रिम तलावांचा वापर करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत होते. महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी १४१ इतक्या मोठया संख्येने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आलेली होती. त्याला पर्यावरणशील दृष्टीकोन जपणा-या नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. ४७६९ श्रीगणेशमूर्तींचे भाविकांनी आपल्या घराजवळच्या कृत्रिम तलावात विसर्जन केले. त्यासोबतच १४ मुख्य विसर्जन तलावांमधील जलाशय प्रदूषित होऊ नयेत याकरिता निर्माण केलेल्या गॅबियन वॉल अंतर्गत भागात त्रिमूर्ती विसर्जित करून नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जन सोहळा पार पडण्यावर भर दिला.
सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर श्रीमूर्तींच्या विसर्जनासाठी तराफ्यांची व्यवस्था, आकाराने मोठ्या मूर्तींसाठी फोर्कलिफ्टची व्यवस्था ठेवण्यात आली होती. उपस्थित भाविकांना आणि ध्वनीक्षेपकाद्वारे व्यासपीठावरून महत्त्वाच्या सूचना दिल्या जात होत्या. पुरेशा प्रमाणात विद्युत व्यवस्था तसेच पर्यायी जनरेटर व्यवस्था होती. मुख्य विसर्जन स्थळांवर नजिकच्या नागरी आरोग्य केंद्रामार्फत वैद्यकीय पथके तैनात होती शिवाय संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून स्वयंसेवक, लाईफगार्ड्स व्यवस्था अधिक कृतीशीलपणे कार्यरत होती. त्यासोबतच अग्निशमन दलाचे जवानही कार्यरत होते.
नवी मुंबई हे स्वच्छतेत अग्रणी असलेले शहर असल्याने विसर्जनस्थळी भाविकांनी जलाशयामध्ये निर्माल्य टाकू नये असे आवाहन करण्यात येत होते. प्रत्येक विसर्जनस्थळी ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी स्वतंत्र कलश ठेवण्यात आलेले आहेत. कालच्या गौरी गणपती विसर्जन सोहळ्यात ३३ टन ६४० किलो निर्माल्य संकलित झालेले आहे. हे निर्माल्य स्वतंत्र वाहनांव्दारे प्रकल्पस्थळी नेण्यात आले असून त्याठिकाणी निर्माल्याचे पावित्र्य राखून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे.
सेक्टर १९, कोपरखैरणे येथील मुख्य विसर्जन तलावाच्या ठिकाणी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प राबवला जात आहे. श्रीसदस्य समुहाने संकलित निर्माल्य वेगळे करीत असलेल्या ठिकाणी आयुक्तांनी भेट देऊन श्रीसदस्यांच्या सेवाभावी कार्याची प्रशंसा करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. सर्वच ठिकाणी पोलीस यंत्रणेचा कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त होता. नवी मुंबईकर नागरिक हे शिस्तप्रेमी असल्याने सर्वांच्या सहकार्यातूनच श्री गणेशोत्सवातील मोठ्या प्रमाणात होणारे गौरी गणपतीचे विसर्जन सुव्यवस्थितरित्या संपन्न झाले त्याबद्दल सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करीत नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सातव्या आणि दहाव्या दिवशीच्या विसर्जन सोहळ्याप्रसंगीही नागरिकांनी असेच सहकार्य करावे व नवी मुंबईची इकोफ्रेंडली ओळख गणेशोत्सवातून अधिक दृढ करावी असे आवाहन केले आहे.
