३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत विशेष कार्यक्रमाचं उद्घाटन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
नागपूर: आपल्या देशात रस्ते अपघातामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यामध्ये ७० टक्के प्रमाण हे १८ ते ४५ या वयोगटातील आहे. ही बाब चिंताजनक आहे. रस्ते सुरक्षेसाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने संसद सदस्य रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला असून या समितीमध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी सक्रीय सहभाग नोंदवून आपल्या शहरातील अपघात प्रवण स्थळांची माहिती संबंधित यंत्रणांना द्यावी आणि ती दुरुस्त करण्यासाठी पाठपुरावा करावा. असं आवाहन केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपूर मध्ये केलं.
रस्ते अभियांत्रिकीमध्ये सुधारणा, रस्ते नियमांबद्दल शिक्षण, कायद्याची कठोर अंमलबजावणी, तसेच अपघात समय दाखवण्याची तत्परता या चतु: सूत्रीवर भर देत रस्ते सुरक्षा या क्षेत्रामध्ये भरीव काम करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नागपूर आणि प्रादेशिक परिवहन विभाग नागपूर तसेच संसद सदस्य रस्ता सुरक्षा समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत विशेष कार्यक्रमाचं उद्घाटन काल नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
संसद सदस्य रस्ता समिती नागपूरचे उपाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे, प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यावेळी मंचावर उपस्थित होते.
नागपूरच्या संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीने घेतलेल्या बैठकांमुळे आणि तब्बल २० ब्लॅक स्पॉट मध्ये केलेल्या सुधारणांमुळे नागपूर ग्रामीणमध्ये अपघाताचे प्रमाण हे ८ टक्क्यांनी तर मृत्यूचे प्रमाण हे १ टक्क्याने कमी झालं आहे तर शहरी भागांमध्ये अपघातांचे प्रमाण २३ टक्क्यांनी कमी झाल असून १६ टक्के मृत्यू घट झाली असल्याचे गडकरी यांनी सांगितलं.
रस्ते अपघातांचे कारण हे रस्ते अभियांत्रिकी असल्याने यासाठी जवळपास १२.५ हजार कोटी रुपये खर्च करून ब्लॅक स्पॉट दुरुस्त करत असल्याची माहिती त्यांनी दिली. जनआक्रोश सारख्या स्वयंसेवी संस्था शालेय विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा संदर्भात देत असलेल्या शिक्षणाचे उपक्रमाचे ही त्यांनी विशेष कौतुक केलं.
राजु जाधव या सामाजिक कार्यकर्त्याने आतापर्यंत त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून जवळपास ८ हजार जखमी लोकांना मदत केली आणि ५०० लोकांचे प्राण वाचवले याचा देखील विशेष उल्लेख गडकरी यांनी केला आणि राजू जाधव यांच्या सारखेच जिवनरक्षक समाजकार्य इतर लोकांनी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं.
रस्ते सुरक्षा सप्ताहाच रूपांतर महिन्यामध्ये करण्यात आला आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने सर्वच इकोनॉमी गाड्यांना एअर बॅग़ बंधनकारक केली आहे. रस्ते सुरक्षा संदर्भात अधिक जनजागृती निर्माण व्हावी यासाठी असे १०० कार्यक्रम पुढच्या वर्षी आयोजित करण्यासाठी आवश्यक ते सर्व आर्थिकसहाय्य माझ्या मंत्रालयातर्फे दिला जाईल अशी ग्वाही गडकरी यांनी याप्रसंगी दिली.
याप्रसंगी उपस्थित सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांनी रस्ते सुरक्षा नियमांच्या कडक अंमलबजावणीसाठी दंड वाढवण्याची गरज असल्याची सांगितलं .रस्ते सुरक्षा प्रचारासाठी आपण विनामूल्य सहकार्य करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना डॉ. विकास महात्मे यांनी अपघात झाल्याच्या पहिल्या तासामध्ये जीव वाचण्याची शक्यता वाढते असे सांगून या गोल्डन अवर मध्ये रस्त्यालगत असलेले दुकाने, ठेले यांना प्रथमोपचाराच्या किटस् वाटप करून त्यांना अशा अपघातासमयी काय काळजी घेणे आवश्यक आहे या संदर्भातले प्रशिक्षण सुद्धा काही स्वयंसेवी संस्थेमार्फत देण्यात येत असल्याचा उल्लेख केला.
संसद सदस्य सुरक्षा समितीने घेतलेल्या बैठकांमुळे नागपूर शहर आणि ग्रामीण मध्ये अपघातांचे प्रमाण आणि मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले असेही त्यांनी या वेळी नमूद केलं. या विशेष कार्यक्रमांतर्गत सडक सुरक्षारक्षक गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव आणि स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, वाहतूक पोलीस अधिकारी उपस्थित होते.
