भर पावसात कंळबुसरे येथील घरावर वन विभागाने फिरवला बुलडोझर
उरण, दि. ७( विठ्ठल ममताबादे): राज्यशकट बदलल्या-बदलल्या म्हणजेच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागताच जुलै महिन्याच्या भर पावसात उरण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंळबुसरे गावातील रहिवाशांच्या घरावर कारवाईचा बुलडोझर फिरवला आहे. वन विभागाच्या या कारवाईमुळे कंळबुसरे गावातील रहिवासी भितीच्या सावटा खाली आपल्या कुटुंबासह जीवन जगत आहेत.
उरण तालुक्यातील काही गावे, वस्त्या या खाडी किनाऱ्यावर किंवा डोंगर परिसरात वसल्या आहेत. त्यामुळे गावातील गरीब कुटुंबातील सदस्य, रहिवासी हे आप-आपल्या कुटुंबासह वास्तव करण्यासाठी खाडी किनाऱ्यावर किंवा गाव परिसरात गरजे पोटी वाढीव घरे बांधून शासनाचा असणारा दंड भरून वास्तव करत आहेत. कळंबुसरे गावातील एका रहिवाशाने गावात कुटुंबाच्या गरजेपोटी वाढीव घराचे बांधकाम केले होते. परंतु, राज्याच्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे व राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागताच उरण येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी म्हणून मंगळवारी (दि. ५) कळंबुसरे गावातील घरावर भर पावसाच्या जुलै महिन्यात बुलडोझर फिरवून सदर कुटुंबाचा संसार उद्धवस्त करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भर पावसाच्या जुलै महिन्यात गरजे पोटी बांधलेल्या घरावर बुलडोझर फिरवल्याने अशा कृत्याचा निषेध कळंबूसरे गावातील रहिवाशांनी व्यक्त केला आहे.
उरण तालुका वन अधिकारी हे वन विभागाच्या जागेवर, खाडी किनाऱ्यावर उभ्या राहणाऱ्या कंटेनर यार्ड, प्रकल्पावर, धनिकांच्या इमारती, फाँम हाऊस वर कारवाई करत नाहीत. तसेच वन विभागाच्या डोंगर, माळरानातून पोकलेन मशिनद्वारे माती दगड नेणाऱ्यावर, दगड खाणीवर कारवाई करत नाहीत. परंतु कळंबुसरे गावातील रहिवाशांनी गरजे पोटी बांधलेल्या घरावर भर पावसाच्या जुलै महिन्यात बुलडोझर फिरवून रहिवाशांना बेघर करण्याचं धाडस करत आहेत. याचा आम्ही निषेध करत आहोत – सरपंच नुतन कुलदिप नाईक
कंळबुसरे गावातील रहिवाशाने वन जागेत घर बांधले होते. त्यामुळे वन विभागाने कारवाई केली आहे. ती योग्य प्रकारे केली आहे आणि वन विभागात कोणी अतिक्रमण केले तर या पुढे ही कारवाई करण्यात येणार – उरण वन अधिकारी कोकरे

