मास्क, सुरक्षित अंतर असे नियम न पाळणा-यांकडून नवी मुंबई महानगरपालिकेने वसूल केला ३५ लाख दंड
नवी मुंबई, दि.४: लॉकडाऊननंतर ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार टप्प्याटप्प्याने विविध गोष्टींना सुरूवात करण्यात आली आहे. तथापि ही सवलत दिली जात असताना कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर, सतत हात धुणे आणि सुरक्षित अंतर राखणे या तीन महत्वाच्या सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. तशा प्रकारच्या सूचना, जनजागृती विविध माध्यमातून सातत्याने केली जात आहे.
तथापि या सुरक्षेच्या नियमांचे काही नागरिकांकडून उल्लंघन होताना दिसते. अशा बेजबाबदारपणे वागणा-या नागरिकांना स्वयंशिस्त लागावी व समज मिळावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ३५ लाखाहून अधिक दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
कोरोनावर विशिष्ट लस अथवा औषध उपलब्ध नसल्याने सध्यातरी सुरक्षित नियमांचे पालन हाच सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याचे काटेकोर पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकत्याच एपीएमसी मार्केटला दिलेल्या धडक भेटीतही कोणावर मुद्दामहून कारवाई नाही पण जे आरोग्याविषयी बेफिकिरी दाखवतील आणि स्वत:सह इतरांचे आरोग्य धोक्यात आणतील त्यांना शिस्त लावणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले होते.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अतिशय गरजेच्या अशा सुरक्षा नियमांचे पालन न करणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याकरिता विभाग कार्यालय स्तरावर विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत नियम मोडणा-या नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे प्रबोधनही करण्यात येत आहे. त्यासोबतच या नागरिकांना समज मिळावी म्हणून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या कारवाईतून आत्तापर्यंत ३५ लाख ५० हजार ९५० रूपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
यामध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या व्यक्तीकडून रू. १ हजार, मास्क न लावणा-या व्यक्तीकडून रू. ५००/-, सुरक्षित अंतर न पाळणा-या व्यक्तीकडून रू. २००/- व सुरक्षित अंतराचे नियम मोडणा-या व्यापारी/दुकानदार यांचेकडून रू. २ हजार अशाप्रकारे दंड वसूल करण्यात येत आहे. आपल्याला दंडात्मक रक्कम भरावी लागू नये याकरिता तरी नागरिकांनी आपल्या व इतरांच्या आरोग्यासाठी सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे ही त्यामागील भूमिका आहे. यानुसार –
सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या २६ व्यक्तींकडून रू. २७ हजार,
मास्क न लावणा-या ३४२४ व्यक्तींकडून रू. १६ लक्ष ४८ हजार ६५०,
सुरक्षित अंतर न पाळणा-या २२४२ व्यक्ती / व्यापारी, दुकानदार यांचेकडून रू. १८ लक्ष ७६ हजार ३००,
अशाप्रकारे एकूण ३५ लाख ५० हजार ९५० रूपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत देनंदिन व्यवहार टप्प्याटप्प्याने खुले केल्यानंतर कोव्हीच्या विषाणूला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी मास्क, सुरक्षित अंतर, वारंवार हात धुणे हीच प्रतिबंधात्मक ढाल आहे हे लक्षात घेऊन नागरिकांनी अधिक गांभीर्याने सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यांचे पालन न करण्याची बेफिकिरी दाखविणे वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्यासाठी घातक आहे.
म्हणूनच यापुढील काळात नागरिकांनी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे आणि महानगरपालिकेला दंडात्मक कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये असे सूचित करतानाच महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आपल्याला व आपल्यामुळे कुटुंबियांना व इतरांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची प्रत्येक नागरिकाने काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
