महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य
सोलापूर, दि. ५: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं पहिली बैठक केंद्र सरकारनं घेतली आहे. हा वाद जुना असल्यानं, यावर निर्णय व्हायला काही अवधी जाईल. पण निश्चित तोडगा निघेल अशी ग्वाही केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी दिली. सोलापूर मध्ये पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. दरम्यान, झारखंडमधल्या जैन तीर्थक्षेत्र असलेल्या सम्मेद शिखरजीसंदर्भातला वाद सोडवण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक आहे. हा विषय संवदेनशील असून, राज्य सरकारच्या अखत्यारीतला असल्यानं केंद्र सरकार राज्य सरकारशी याविषयावर चर्चा करेल असं त्यांनी सांगितलं.
३७० कलम हटवण्याचं महत्वपूर्ण काम मोदी सरकारनं केलं असून, भव्य राम मंदिर निर्माण करण्याबरोबरच, आता भावी काळात देशात समान नागरी कायदादेखील लागू होणार आहे. पुरावे, तथ्यावर आधारित खर्या इतिहासाच्या पुनर्लेखनाची महत्वपूर्ण काम केंद्र सरकार करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. नळदुर्ग येथे अलियाबाद पुलाची पाहणीही मिश्रा यांनी केली. मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचा मुक साक्षीदार असलेल्या या ऐतिहासिक पुलाला राष्ट्रीय स्मारक सन्मान मिळावा, तसंच हा पुल वाचवण्यासाठी शहीद झालेले पहिला अशोकचक्र पुरस्कार मिळालेले शहीद जवान बचित्तर सिंह यांचंही भव्य स्मारक उभं राहावं, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
