गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडून २९-३० सप्टेंबर २०२२ रोजी स्वच्छ शहर संवाद आणि तंत्रज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
मुंबई, दि. २८ : गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने (एमओएचयुए) स्वच्छ भारत शहर अभियानाची आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १७ सप्टेंबर २०२२ (सेवा दिवस) ते २ ऑक्टोबर २०२२ (स्वच्छता दिवस) हा पंधरवडा, संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचा स्वच्छ अमृत महोत्सव पंधरवडा म्हणून घोषित केला आहे. या निमित्ताने, गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने २९-३० सप्टेंबर २०२२ रोजी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ भारत शहर अभियानाचा भाग म्हणून स्वच्छ शहर संवाद आणि तंत्रज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे.
केंद्रीय गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी २९ सप्टेंबर २०२२ रोजी संवाद आणि तंत्रज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. हा कार्यक्रम स्वच्छ भारत अभियान शहर २.० चा एक क्षमता विकास उपक्रम असून, राज्ये आणि शहरांना कचरा व्यवस्थापनामधील नवीन घडामोडींची माहिती देऊन सुसज्ज करणे, हे या मागचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमात महापालिका घनकचरा आणि द्रव कचरा व्यवस्थापनाशी संबंधित विषयांवर विशेषत: उच्च दर्जाच्या तांत्रिक आणि प्रशासकीय चर्चांचा समावेश असेल, ज्यामुळे महापालिका आपल्या कचरा मुक्त होण्याच्या प्रवासामधील धोरणे, सर्वोत्तम पद्धती आणि आव्हाने हाताळण्यासाठी सक्षम होतील. संवाद कार्यक्रमात अंदाजे १६ राज्यांमधील वक्ते आपले अनुभव, शिक्षण आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करतील.
देशभरातील कचरा व्यवस्थापनातील सर्वोत्कृष्ट मॉडेल्स दाखवणारे टेक प्रदर्शनही संवाद कार्यक्रमाचा एक भाग असेल. सुमारे ३५ तंत्रज्ञान पुरवठादार कचरा व्यवस्थापनातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवतील. या प्रसंगी, १७ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू झालेल्या इंडियन स्वच्छता लीग (आयएसएल) आंतरशहर स्वच्छता अभियान स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा करून त्यांचा सत्कार करण्यात येईल.
संवाद हा १ ऑक्टोबर २०२२ रोजी होणार्या महा अंतिम सोहळ्याची प्रस्तावना असेल, ज्यामध्ये बहुप्रतिक्षित आझादी@७५ स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार घोषित केले जातील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांच्या विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी शहरे आणि राज्यांना गौरवतील.
