जी-20 चे नंतर आता, भारत कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील जागतिक भागीदारी परिषदेचे (GPAI) अध्यक्षपदही भूषवणार
जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांची संघटना, जी-20 चे अध्यक्षपद भारताला मिळाल्यापाठोपाठ, कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्राशी संबंधित जागतिक भागीदारी संघटनेचे (GPAI) अध्यक्षपदही भारत भूषवणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन, जबाबदार आणि मानवकेंद्री विकास साध्य करण्यासाठीचा हा एक आंतरराष्ट्रीय उपक्रम आहे.
कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत, २०३५ पर्यंत ९६७अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणे अपेक्षित आहे. आणि २०२५ पर्यंत, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात, ४५० ते ५०० अब्ज डॉलर्सची भर पडण्याची शक्यता आहे. याचा अर्थ, भारताच्या ५ ट्रीलियन अर्थव्यस्थेच्या उद्दिष्टांत, हा वाटा, १० टक्के इतका असेल. जीपीएआय, ही २५ सदस्य देशांची संघटना असून, त्यात अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रांस, जर्मनी, इटली, जपान, मेक्सिको, न्यूझीलंड, कोरिया आणि सिंगापूर अशा देशांचा समावेश होतो. भारत, २०२० साली, या संघटनेचा संस्थापक सदस्य देश,म्हणून यात सहभागी झाला.
उदया, म्हणजे २१ नोव्हेंबर २०२२ रोजी टोक्यो इथे होणाऱ्या या संघटनेच्या बैठकीत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर भारताचे प्रतिनिधित्व करतील. या बैठकीत, मावळते परिषद अध्यक्ष, फ्रांसकडून भारत औपचारिकरित्या हे अध्यक्षपद स्वीकारेल. परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडप्रक्रियेत, भारताला, पहिल्या पसंतीची दोन तृतीयांश पेक्षा अधिक मते मिळाली. तर कॅनडा आणि अमेरिकेला, त्या खालोखाल मते मिळाली. त्यामुळे या दोन्ही देशांची परिषदेच्या सूकाणू समितीच्या जागांवर नियुक्ती करण्यात आली.
भारताला हे अध्यक्षपद मिळण्यामागे, सगळे जग भारताकडे एक विश्वासार्ह तंत्रज्ञान भागीदार म्हणून कशाप्रकारे बघत आहे, हे ही अधोरेखित होते.कारण भारताने कायमच नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाच्या नैतिक वापरावर भर दिला आहे.
