फळांच्या रसांच्या लेबल आणि जाहिरातीतून १०० % फळांच्या रसांचा दावा काढून टाकण्याचे चे खाद्यपदार्थ व्यवसाय परिचालकांना निर्देश
मुंबई/नवी दिल्ली, दि. ४: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) सर्व खाद्य पदार्थ व्यवसाय परिचालकांना (एफबीओ) पुनर्प्रक्रिया केलेल्या फळांच्या रसांच्या लेबल्स आणि जाहिरातींमधून ‘१०० % फळांच्या रसांचा’ कोणताही दावा तात्काळ प्रभावाने काढून टाकण्याचे निर्देश जारी केले आहेत. १ सप्टेंबर २०२४ पूर्वी सर्व विद्यमान छापील वेष्टन साहित्य संपवण्याच्या सूचना सर्व एफबीओना देण्यात आल्या आहेत.
अनेक एफबीओ १०० % फळांचे रस असल्याचा दावा करून विविध प्रकारच्या पुनर्प्रक्रिया केलेल्या फळांच्या रसांची चुकीच्या पद्धतीने विक्री करत असल्याचे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या निदर्शनास आले आहे. कसून तपासणी केल्यावर, एफएसएसएआयने असा निष्कर्ष काढला आहे की, अन्न सुरक्षा आणि मानके (जाहिरात आणि दावे) नियमावली, २०१८ नुसार, ‘१०० %’ दावा करण्याची कोणतीही तरतूद नाही. असे दावे दिशाभूल करणारे आहेत, विशेषत: अशा परिस्थितीत जेथे फळांच्या रसाचा मुख्य घटक पाणी असून दावा केलेला प्राथमिक घटक फक्त मर्यादित प्रमाणात त्यात असतो, किंवा जेव्हा फळांचा रस पाणी आणि फळांच्या गराचा वापर करून पुनर्प्रक्रिया केला जातो.
पुनर्प्रक्रिया केलेल्या फळांच्या रसांचे ‘१०० % फळांचे रस’ म्हणून विपणन आणि विक्री करण्याबाबत जारी केलेल्या स्पष्टीकरणात, एफबीओनी अन्न सुरक्षा आणि मानक नियम २०११ (फूड प्रोडक्ट्स स्टँडर्ड्स आणि फूड ॲडिटीव्ह) च्या उप-नियम २.३.६ अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या फळांच्या रसांच्या मानकांचे पालन करण्याचे त्यांना निदर्शनास आणून दिले गेले आहे. या नियमानुसार या मानकांमध्ये समाविष्ट असलेल्या उत्पादनांना अन्न सुरक्षा आणि मानक (लेबलिंग आणि डिस्प्ले) नियमन, २०२० नुसार लेबल केले जाणे आवश्यक आहे. विशेषत:, घटक सूचीमध्ये, फळाच्या गरावर पुनर्प्रक्रिया करून बनवलेला रस यासाठी “पुनर्प्रक्रिया केलेला” असा उल्लेख नमूद करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, जर पौष्टिक मधुर पदार्थ १५ gm/kg पेक्षा जास्त असतील तर, उत्पादनाला ‘मधुर रस’ असे लेबल केले पाहिजे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण देशभरातील अन्न सुरक्षा मानकांचे नियमन आणि पर्यवेक्षण करून सार्वजनिक आरोग्याला संरक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे.
