“जो पर्यंत नियोजित रांजणपाडा रेल्वे स्टेशनला धुतूम रेल्वे स्टेशन असे नाव देत नाही, तो पर्यंत नियोजित रांजणपाडा रेल्वे स्टेशन वरून रेल्वे ने प्रवास करणार नाही” – शरद ठाकूर
उरण, दि. २४(विठ्ठल ममताबादे): दि. २३ मार्च २०२३ रोजी उरण तालुक्यातील धुतूम ग्रामस्थांतर्फे सिडको आणि रेल्वे प्रशासना विरोधात धुतूम रेल्वेस्टेशन नामांतरासाठी जन आंदोलन पुकारण्यात आले. नियोजित रांजणपाडा रेल्वेस्टेशन हे संपूर्ण मौजे धुतूम (शेमटीखार) या धुतूम ग्रामपंचायत महसूल क्षेत्रात वसलेले आहे. या ठिकाणी सिडको व रेल्वे अधिकारी यांनी चुकीच्या पद्धतीने रांजणपाडा रेल्वे स्टेशन असे नामांतर केले आहे. गेली दहा वर्षे धूतूम ग्रामपंचायत या बाबत पाठपुरावा करत असून सिडको व रेल्वे यांनी वेळोवेळी दखल घेतो सांगून काम पूर्ण करून घेतले, परंतु नामांतर चा प्रश्न तसाच ठेवला.

रेल्वे स्टेशनला धुतुम रेल्वे स्टेशन ऐवजी रांजणपाडा हे नाव देण्यात आले. याचा निषेध म्हणून रेल्वे स्टेशन वर मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी मोर्चा दरम्यान दिली. धूतूम च्या सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली धुतूम ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नियोजित रांजनपाडा रेल्वे स्टेशन येथे मोर्चा काढला होता. या वेळी माजी सरपंच रेश्मा शरद ठाकूर, माजी सरपंच शंकर अनंत ठाकूर, माजी सरपंच अमृत गोपीचंद ठाकूर, पी. जी. शेठ ठाकूर, उपसरपंच कविता पाटील, माजी उपसरपंच शरद ठाकूर, सदानंद विठ्ठल ठाकूर, नारायण शंकर ठाकूर, दत्ता धावजी ठाकूर, सुनील जयराम ठाकूर, संतोष नारायण ठाकूर, नंदेश दशरथ ठाकूर, करण सदानंद ठाकूर, दतू भिवा ठाकूर, अमृत रामचंद्र ठाकूर, रामचंद्र नारायण ठाकूर, पुंडलिक गोपीचंद ठाकूर, लक्षुमन रघुनाथ ठाकूर तसेच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सदस्या व अनेक मान्यवर ग्रामस्थ, तरुण वर्ग व महिला भगिनी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

अनेक वर्षांपासून धुतुम ग्रामपंचायत तर्फे रेल्वे प्रशासन व सिडको प्रशासनाशी धुतुम रेल्वे असे नामकरण करावे यासाठी पत्रव्यवहार सुरु आहे. मात्र अजूनही रेल्वे स्टेशनला धुतुम हे नाव देण्यात आलेले नाही. जर रेल्वे स्टेशनला धुतुम हे नाव मिळाले नाही तर हा लढा अधिक तीव्र केला जाईल. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा प्रशासनाला सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी दिला. तर यावेळी उपस्थित माजी उपसरपंच शरद ठाकूर यांनी जोपर्यंत धुतुम येथील रेल्वे स्टेशनला धुतुम हे नाव देणार नाही तोपर्यंत रांजणपाडा रेल्वे स्थानकावरून प्रवास करणार नाही असा निश्चय केला. संकल्प केला. एकंदरीत या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
