उपराष्ट्रपतींनी आज उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील सैनिक स्कूलचे केले उद्घाटन
गोरखपूर, दि. ०७: आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नागरिकांना राष्ट्रवादाशी तडजोड न करण्याबाबत सावध केले आणि अशा तडजोडीला “राष्ट्राशी केलेला सर्वात मोठा विश्वासघात” असे संबोधले. “जिथे कुठे कोणीही राष्ट्राच्या अखंडतेला धोका निर्माण करेल, ते आपण सहन करता कामा नये,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
राष्ट्र कर्तव्य नेहमीच आपले स्वतःचे हित आणि राजकीय स्वार्थापेक्षा वर ठेवले पाहिजे हे अधोरेखित करताना उपराष्ट्रपतींनी इशारा दिला की असं न केल्यास ते भारताच्या अनेक सहस्रकांच्या नागरी संस्कृतीवरील हल्ला ठरेल.
आज उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे सैनिक स्कूलच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख भाषण करताना उपराष्ट्रपतींनी सैनिक स्कूल चित्तोडगड येथे विद्यार्थी असताना घालवलेल्या दिवसांची आठवण काढली आणि त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवासात त्यांच्या मातृसंस्थेने केलेल्या प्रभावाचे अधोरेखन केले. “माझा जैविक जन्म किताना गावात झाला असला तरी माझा खरा जन्म सैनिक स्कूल चित्तोडगड येथे झाला,” असे त्यांनी सांगितले.
शिक्षण हे परिवर्तनात्मक बदलांचे केंद्रस्थान आहे यावर भर देत धनखड यांनी शिक्षणाच्या महत्त्वावर जोर दिला आणि त्याने व्यक्तींना त्यांच्या जीवनावर अधिक नियंत्रण मिळविण्यात कशी मदत केली आणि समाजातील गैरप्रवृत्तींवर विजय मिळवण्यात शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले.
कैडेट्सना संबोधित करताना, उपराष्ट्रपतींनी त्यांच्या मनातून भीतीचा विचार काढून टाकण्याचे आवाहन केले. चांद्रयान-३ च्या यशाचे श्रेय चांद्रयान-२ च्या धड्यांवर आधारित असल्याचे सांगत धनखड म्हणाले, “अपयश हे यशाचे पायाभूत तत्व आहे.”
नव्याने उद्घाटन झालेल्या गोरखपूर येथील सैनिक स्कूल परिसरात जगदीप धनखड आणि डॉ. सुदेश धनखड यांनी आज त्यांच्या दिवंगत मातांच्या स्मरणार्थ म्हणजेच श्रीमती केसरी देवी आणि श्रीमती भगवती देवी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रोपांची लागवड केली. याप्रसंगी त्यांनी परिसरातील शूटिंग रेंजचे उद्घाटनही केले.
