१५०० हुन अधिक शेतकऱ्यांनी नोंदविल्या वैयक्तिक हरकती
उरण, दि. २८ (विठ्ठल ममताबादे) : सिडकोने उरण तालुक्यातील चाणजे मधील ९९१, नागाव – १२७, रानवड १६०, बोकडविरा-३३, पाणजे – ३ व फूंडे येथील ४ नवघर मधील २ असे एकूण १ हजार ३२० सर्व्हे नंबर मधील ३६६ हेक्टर जमीन संपादित करण्याचे १२ ऑक्टोबर २०२२ रोजी एका वर्तमानपत्रातून जाहीर केले. मात्र उरण मधील सिडकोच्या या आरपीझेड प्रकल्पासाठी होणाऱ्या भू संपादनाला विरोध करत उरण येथील नागाव, चाणजे, रानवड, बोकडविरा, फुंडे, नवघर, पाणजे आदी गावातील १५०० शेतकऱ्यांनी गुरुवार दि. २७/१०/२०२२ रोजी सिडको भवनावर जाऊन सिडकोच्या भूसंपादन निर्णयाचा निषेध करत या निर्णया विरोधात हरकती नोंदविल्या.
१९७० साली सिडकोने विकासाच्या नावाखाली उरण मधील ११ हजार हेक्टर पेक्षा अधिक जमीन संपादित केली आहे. त्यानंतर आज ५२ वर्षांनी पून्हा उरण मधील उर्वरीत शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठ पुन्हा प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे उरण मधील मूळ जमीन मालक, स्थानिक नागरिक पुन्हा एकदा हद्दीपार होणार आहेत. अशा सिडकोच्या विविध निर्णयांमुळे उरण मधील स्थानिक नागरिकांवर उपरे होण्याची वेळ आली आहे. जमीन संपादन झाल्यावर पुढे काय? अशी भविष्याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
सिडकोच्या भूसंपादनाची नोटीस (जाहिरात) दि. १२/१०/२०२२ रोजी एका दैनिकात प्रसिद्ध झाली होती. दि. २७ ऑक्टोबर २०२२ रोजी दैनिकात जाहिरात प्रसिद्ध होऊन १५ दिवस पूर्ण झाल्याने उरण विभागातील शेतकरी सिडकोच्या भूसंपादन कायद्याला विरोध करण्यासाठी व वैयक्तिक हरकती नोंदविण्यासाठी कॉ. भाऊ पाटील चौकात एकत्र आले. तेथून सर्व शेतकरी सिडकोच्या भूसंपादन विभागाच्या कार्यालयावर धडकले. यावेळी सिडकोच्या भूसंपादन विभागात १५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी वैयक्तिक हरकती नोंदविल्या. गावठाण हक्क परिषद व चाणजे शेतकरी समितीने केलेल्या मागणी नुसार सिडको भूसंपादन व भूमापन विभागाने शेतकऱ्यांना हरकती नोंदविण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांनी स्वतः साठी बांधलेली तसेच विविध विभागातील स्थानिक नागरिकांनी शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करून घरांचे बांधकाम केले आहे. अशा प्रकारची हजारो घरे या जमिनीवर आहेत. सिडकोच्या या भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये या राहत्या घरांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे उरणमधील शेतकरी व नागरीकांकडून या भू संपादन निर्णयाला प्रचंड विरोध असून सिडको प्रशासनाच्या या निर्णया विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
यावेळी कॉ. भूषण पाटील, सुधाकर पाटील, काका पाटील , जगदीश तांडेल , संजय कडू, परिक्षीत ठाकूर, अनंत घरत ,जूनूशेट थळी , काशीनाथ गायकवाड, सरपंच चेतन गायकवाड,उपसरपंच भुपेंद्र घरत, गजानन म्हात्रे, माया पाटील, सरपंच रंजना पाटील,रतन पाटील, संध्या ठाकूर, किशोर पाटील, जितेंद्र ठाकूर, एल् .जी. पाटील, अँड प्रदिप पाटील, दत्ता घरत, जे. के. म्हात्रे, राजाराम पाटील, आप्पा कडू, शरद कडू, बाळू थळी, सिताराम घरत कमळावर थळी, मोहन काठे, नयन म्हात्रे, महेश म्हात्रे, सरपंच चिंतामण पाटील, मधुसूदन म्हात्रे, माजी सरपंच केगाव महेश म्हात्रे, अरविंद घरत, कॉ. रामचंद्र म्हात्रे, कॉ. संजय ठाकुर इत्यादी उरण विभागातील शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
