शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांचीही घेणार भेट
कोल्हापूर, दि. ३१: महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर नव्याने प्रवेश केलेल्या बीआरएस पक्ष सध्या महाराष्ट्रात आपली नवी टीम बनवू पाहतो आहे. याच व्यूहरचनेचा एक भाग म्हणून पक्षप्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर अनेक सभा घेऊन पक्षाला पुढे नेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. आता चंद्रशेखर राव पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत असल्याचे वृत्त आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे उद्या सकाळी १० वाजता कोल्हापुरात आगमन होणार आहे. वाटेगाव येथील अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी २ वाजता शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या घरी के. चंद्रशेखर राव यांच्यासाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे कळते. यानंतर चंद्रशेखर राव दुपारी चार वाजता अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरला जातील आणि तेथून परत हैदराबादला जातील.
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांना सोबत घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी हैदराबादमध्ये राव यांची भेट घेतली आणि यापुढे बीआरएससोबत काम करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येत आहे.
