निवेदनद्वारे तात्काळ कारवाईची मनसेची मागणी
उरण, दि.१९(विठ्ठल ममताबादे): अख्या देशभरात सध्या सर्वात जास्त तापत असलेला मुद्दा म्हणजे मशिदीवरील अनधिकृत भोंगे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घेतलेल्या सभेत अनधिकृत भोंग्यांबाबत मुद्दा उपस्थित काय आणि अख्या देशभरात त्या विषयी वादळ निर्माण झालं. महाराष्ट्रातही हा भोंग्यांचा विषय चांगलाच तापला आहे. त्याला अनुसरून नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांबाबत मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संदेश ठाकूर म्हणाले की, माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मशिदिवरील व धार्मिक स्थळावरील भोंग्यावरती कारवाई होणे अपेक्षित होते परंतु तशा स्वरूपाची कारवाई झालेली दिसत नाही. ध्वनिप्रदूषण कायदा हा सर्वांनाच लागू होतो. कोणताही धर्म हा कायद्यापेक्षा मोठा नाही. कोणत्याही धार्मिक स्थळांना नागरिकांच्या आरोग्याला त्रास देण्याचा अधिकार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. तरी सुद्धा नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीत अनेक मशिदीवर अनधिकृत भोंगे सुरु आहेत. अनधिकृत भोंग्यांबाबत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला असतानाही भोंगे का हटवले जात नाहीत? येत्या ३ मे २०२२ पर्यंत मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा; नाहीतर ३ मे २०२२ नंतर हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील तो राबविण्यात येईल. त्यानंतर कोणत्याही प्रकारचा संघर्ष निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी ही सरकार आणि प्रशासनाची राहिल असे संदेश ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महेश जाधव महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मनसे, संदेश भाई ठाकूर रायगड जिल्हा अध्यक्ष, प्रवीण दळवी रायगड जिल्हा उपाध्यक्ष, अविनाश पडवळ माजी तालुकाध्यक्ष पनवेल, रितेश पाटील उपजिल्हा संघटक रोजगार सेना, अल्पेश कडू जिल्हा संघटक वाहतूक सेना, धनंजय भोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष विद्यार्थी सेना, गणेश तांडेल तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
