27 सप्टेंबर 2021रोजी भारत बंद
बंद मध्ये सहभागी होण्याचे शेतकरी कामगार पक्षातर्फे आवाहन
विविध राजकीय पक्ष, संघटना होणार सहभागी
उरण, दि.१७(विठ्ठल ममताबादे): केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन शेतकरी विरोधी कृषी कायद्याच्या विरोधात मागील ९ महिन्यापासून राजधानी नवी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. शेतकरी विरोधी तिन्ही कृषी कायदे मागे घ्या अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन एकीकडे अनुल्लेखाने दुर्लक्ष करून संपवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यानंतर ते प्रचंड पोलिसी दहशत व दडपशाहीने चिरडण्याचा प्रयत्न केला परंतु अद्यापही शेतकरी आपला भूमिकेवर ठाम असून आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. उत्तर भारतात शेतकऱ्यांनी भरवलेल्या महापंचायतीला लाखो शेतकरी एकत्र जमा होत आहेत. या आंदोलनकारी शेतकऱ्यांच्या संयुक्त किसान मोर्चाने येत्या २७ सप्टेंबर २०२१ रोजी भारत बंदची हाक दिली आहे.
देशातील प्रमुख कामगार संघटनांनी ‘भारत बंद’ च्या आंदोलनात सक्रिय सहभागाची घोषणा केली असून कामगार संघटनांनी लढून मिळवलेल्या ४४ कामगार कायदे रद्द करून लागू केलेल्या ४ कामगार विरोधी ‘श्रम संहिता लेबर कोड’ रद्द करण्यात यावेत अशी मागणी केली आहे.
केंद्र सरकारची धोरणे ही शेतकरी व कामगार विरोधी तर आहेतच. महागाई आणि बेरोजगारी वाढवणारे सुद्धा आहेत. या सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील अनेक उद्योग मोडीत काढून ते खासगी उद्योगसमूहांना कवडीमोल किमतीत विकण्याचा सपाटा लावला आहे. धर्माच्या नावाने समाजात दुही माजवून विखारी विद्वेष पसरवण्याचा धंदा जोमाने सुरू आहे. सर्व लोकशाही संकेत पायदळी तुडवून एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरू आहे. हे सरकार सत्तारूढ राहिले तर भारतीय संविधानाचा गाभा असलेली सर्व सार्वभौमता, समाजवाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये नष्ट केली जातील ही साधार भीती आहे. केंद्र सरकारच्या फॅसिस्ट वाटचालीला लगाम घालण्यासाठी २७ सप्टेंबर २०२१ रोजी भारत बंद प्रचंड प्रमाणात यशस्वी करणे सर्व देशप्रेमी नागरिकांचे प्रथम कर्तव्य आणि गांभीर्यपूर्वक जबाबदारी आहे. असे भारतीय शेतकरी कामगार पक्षाची भूमिका आहे. म्हणून भारतीय शेतकरी कामगार पक्ष देशातील सर्व देशप्रेमी जनतेला या भारत बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करीत असून पक्षाच्या सर्व जिल्हा, तालुका व गाव पातळीवर पक्ष संघटना तसेच संघटनातील कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेला संघटीत करून २७ सप्टेंबरला ‘भारत बंद’ मध्ये सक्रिय करून घेऊन आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाने केले आहे.
