“दडपशाही करून सरकारला शेतक-यांचे बळी घ्यायचे आहेत का ? ही दादागिरी तात्काळ थांबवा” – बाळासाहेब थोरात
रत्नागिरी , दि. २५: रत्नागिरी जिल्ह्यात बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी बद्दल गैरसमज पसरवले जात असल्याचं विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिक येथे आज केलं आहे. ही रिफायनरी व्हावी, असं पत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केंद्र सरकारला दिलं होतं. आंदोलकांच्या मागण्या समजून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सामंत म्हणाले. माध्यमांनी फक्त विरोधाच्या बातम्या न दाखवता, रिफायनरीला समर्थन देणाऱ्या बातम्याही दाखवाव्यात, असं आवाहन सामंत यांनी केलं.
दरम्यान, रिफायनरी बाबतीत स्थानिक भूमीपुत्रांच्या मनातल्या शंका-कुशंका दूर करुन त्यांना विश्वासात घ्यावं असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. रत्नागिरीतील बारसु रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिक आंदोलकांना अटक करण्यात येत आहे, पत्रकारांना धमकावण्यात येत आहे याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. विकास सर्वांना विश्वासात घेऊन केला पाहिजे. स्थानिक भूमीपूत्रांच्या हितांचं, हक्कांचं रक्षण झालं पाहिजे असं सांगत संवादातून मार्ग निघेपर्यंत सर्वेक्षण थांबवावं, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.
अजित पवार पुढे म्हणाले की, “रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलक ठाम असून त्यात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावले आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्वेक्षण स्थगित करावं, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी आणि मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीनं सर्वेक्षण करू नका, अशी सरकारला विनंती आहे. सर्वेक्षण त्वरित स्थगित करावं.”
माजी मंत्री व कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करत राज्य सरकार वर टिका केली आहे. आपल्या ट्वीट मध्ये ते म्हणाले की, “रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी स्थळी स्थानिक नागरिक, महिला, मुले सर्वजण रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात आंदोलन करत आहेत. आज पोलिसांनी त्यांच्यावर व वार्तांकन करणा-या माध्यम प्रतिनिधींवर दडपशाही सुरु केली आहे हे अत्यंत निषेधार्ह असून सरकारने ही दडपशाही आणि सर्वेक्षण तात्काळ थांबवावे. सरकारच्या गलथानपणामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बारसू परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक आंदोलन करत असताना त्यांच्यावर दडपशाही करून सरकारला शेतक-यांचे बळी घ्यायचे आहेत का ? ही दादागिरी तात्काळ थांबवा!”
https://twitter.com/bb_thorat/status/1650756915193085953?s=20
