५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात १४४ कलम लागू
सातारा दि. ४: अयोध्या उत्तर प्रदेश येथे ५ ऑगस्ट २०२० रोजी श्रीराम जन्मभूमी मंदिराचे निर्माण कार्य व भूमीपुजनाचा कार्यक्रमाच्या अनुषंगाने समाजातील काही घटकांकडून मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन आरती करुन साजरा करण्याचा प्रयत्न केला जावू शकतो, यामुळे कोविड विषाणूचा संसर्ग होवून सार्वजनिक आरोग्य धोक्यात येवू शकते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून सार्वजनिक शांतता व सुरक्षितेस बाध उत्पन्न होण्याची शक्यता असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करत जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी ५ ऑगस्टच्या रात्री २४ पर्यंत क्रिमीनल प्रोसिजर कोड १९७३ चे कलम १४४ आदेश जाहीर केले आहेत.
या ओदशानुसार सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे सर्वसामान्यांसाठी बंद राहतील. तथापि नित्य नियमाने धार्मिक कार्यक्रम संबंधित धर्मगुरु, पुजारी यांना देण्यात आलेली परवानगी कायम करण्यात येत आहे. तथापी सर्व धर्माचे प्रार्थना, धार्मिक स्थळांवरती धार्मिक विधी करण्याकामी दोन पेक्षा जास्त पुजारी यांना जमा होण्यास मनाई करण्यात आली आहे. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. एकत्र येण्यास तसेच उत्स्फुर्तपणे साखर, पेढे वाटप करणे, गुलाल उधळने, फटाके फोडण्यास या आदेशानुसार मनाई करण्यात आलेली आहे.
