तामिळनाडूत रिपाइं च्या राज्यव्यापी जनजागरण रॅली चे रामदास आठवलेंनी केले उदघाटन
चेन्नई, २७: आगामी विधानसभा निवडणुकीत तामिळनाडू मध्ये एआयएडीएमके, भाजप आणि आरपीआय महायुती चे सरकार निवडून येईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज चेन्नईत रिपाइं च्या राज्यव्यापी जनजागरण रॅली चे उद्घाटन रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. रिपाइं ची ही जनजागरण रॅली सलग १८ दिवस संपूर्ण तामिळनाडू राज्यात फिरणार आहे. रिपाइं(आठवले) चे तामिळनाडू प्रदेश अध्यक्ष फादर सुसाई यांच्या नेतृत्वात ही जनजागरण रॅली तामिळनाडू मध्ये फिरणार आहे.
तामिळनाडूतील गरीब भूमिहीनांना ५ एकर जमीन द्यावी, बेरोजगारांना रोजगार द्यावा, तरुणांना स्वयंरोजगारासाठी शासनाने अर्थसहाय्य करावे, झोपडी धारकांना पक्के घर देण्यात यावे आदी मागण्यांबाबत रिपाइं तर्फे राज्यव्यापी रॅली द्वारे जनजागरण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्या प्रमाणे सन २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर मिळाले पाहिजे त्यासाठी पंतप्रधान आवास योजना तामिळनाडूत राबवुन बेघर लोकांना घर देण्यात यावे.
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत देशात कोट्यावधी लोक अनुदान प्राप्त करीत आहेत. लाखो लोकांना घर मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. केंद्र सरकार विविध योजनांद्वारे जनकल्याणासाठी कार्यरत आहे असे सांगत तामिळनाडूत दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या नेतृत्वातील एआयएडीएमके, भाजप आणि आरपीआय ची महायुती झाली असून ही युती आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चित विजयी होऊन सरकार स्थापन करेल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. तामिळनाडूत विधानसभा निवडणुकीसाठी रिपाइंला निवडणूक आयोगाने हेलिकॉप्टर हे निवडणूक चिन्ह दिले आहे.
तामिळनाडू मधील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदी केशवन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांची रिपब्लिकन पक्षातर्फे जाहीर आदरांजली सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेस रामदास आठवले उपस्थित राहिले. दिवंगत आदी केशवन यांच्या परिवाराचे त्यांनी सांत्वन केले. आदी केशवन हे तामिळनाडूतील रिपब्लिकन पक्षाचा ढाण्या वाघ होते. दिवंगत आदी केशवन यांच्याशी माझे अत्यंत जवळचे व विश्वासू नेते होते. त्यांच्या निधनाने तामिळनाडूतील रिपब्लिकन चळवळीची मोठी हानी झाली आहे अशी शोकभावना रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
यानंतर चेन्नई मध्ये रिपाइं आणि सोशल जस्टीस फोरम तर्फे दिव्यंजनांना मोफत सायकल आणि दिव्यांगांना उपयोगी उपकरणांचे वाटप रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.
