ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता
पनवेल/नवी मुंबई, दि. २८: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब उद्धव ठाकरे यांचे की दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे हा वाद आता मिटल्यात जमा आहे. आज दिनांक २८ जून रोजी रायगड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकाप आदि पक्षातील नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरुन सुरू असलेला वाद निकाली काढण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यासाठी हिरवा कंदील दिला. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे असा ठराव मंजूर केला होता. ठराव मंजूर झाल्यावर भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या पुढाकाराने याविरोधात मोठे आंदोलन करण्यात आले होते.
एकनाथ शिंदे भाजपवासी झाले तर स्थानिक भाजप नेत्यांची होऊ शकते कुचंबणा
तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णया विरोधात स्थानिक भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी मोठा लढा उभारला होता. यात पनवेल, उरण, ठाणे, पालघर, पेण पट्ट्यातील भूमिपुत्रांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येत पाठिंबा दिला होता. परंतू, आता एकनाथ शिंदे जर भाजपवासी झाले तर प्रशांत ठाकूर यांची मोठी कुचंबणा होऊ शकते. कारण या आंदोलनाच्या यशाचे श्रेय त्यांना घेणे अवघड जाईल.
पालघर, ठाणे, रायगड पट्ट्यातील भूमिपुत्र सेनेकडे ओढण्याची व्यूहरचना
सेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना ठाणे-पालघर जिल्ह्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून कारभार हाकण्यासाठी मोकळील देण्यात आली होती. ज्यामुळे स्थानिक आगरी-कोळी समाजातील नेतृत्व काहीसे अडगळीत पडले होते. ज्यात प्रामुख्याने ठाण्यातील दिवंगत सेना नेते अनंत तरे यांचा उल्लेख करणे गरजेचे आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेतील ठाणे, कल्याण, डोंबिवली पट्ट्यातील सुभाष भोईर व विजय साळवी आदि नेत्यांना मोठी संधि उपलंध होऊ शकते. आजच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयामुळे उत्तर रायगड जिल्ह्यातील पनवेल व उरण परिसरातील तरुण शिवसेनेकडे वळवणे त्यांना सोप्पं जाईल. यात आणखी एक बाब म्हणजे भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांनी १९९९ साली शिवसेनेच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. अशावेळी शिवसेनेच्या नेत्यांना आम्ही एका सेना नेत्याचेच नाव विमानतळाला दिल्याचे मतदारांना सांगत भविष्यात निवडणुकांत मत मागणे सोप्पे जाईल इतके नक्की.