चलता है इंडिया….It’s ओके…
“बडे बडे देशोंमें ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है..” DDLJ मधला हा भलताच गाजलेला संवाद चक्क एकदा बराक ओबामांनी आपल्या भाषणात वापरला होता.. ! मात्र त्यावरुन दिसते ती अॅटि़ट्यूड म्हणजे “चलता है..” यावरुन “चलता है इंडिया” या नावाचं एक पुस्तकच चक्क २०१८ मध्ये प्रकाशित झालंय.. ! कंपन्यांनी उत्पादनाच्या दर्जात तडतोड केलीय, हॉकीमध्ये एकदा आॉलिंपिक जिंकूनही आपण मागे पडलोय.. चालतंय.. किंवा इतक्या मोठ्या देशात रेल्वेचे इतके अपघात तर होणारच, भ्रष्टाचार तर होणारच त्याबद्दल मी काय करु शकतो… It is okay, take it easy, let it be, this is good enough, but what can I do, I don’t care..अशा सर्व वाक्यांना अल्पेश पटेल आपल्या “चलता है इंडिया” या पुस्तकात म्हणतो “चलता है-सीएच अॅटिट्यूड..”! “भारतीय लोकांची अल्पसंतुष्टता, दर्जाबाबत शॉर्टकटस वापरणं, निराश होणं, हार पत्करणं किंवा दुर्लक्ष करणं असं सगळं यातून दिसत जातं” असं लेखक प्रस्तावनेत म्हणतो.
आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी शिक्षण, वाहतूक, चित्रपटक्षेत्र आणि क्रीडाक्षेत्र या चार क्षेत्रांमधली उदाहरणं लेखकानं दिली आहे.. हीच क्षेत्रं का निवडली हे सांगताना “सरकार, खाजगी उद्योगधंदे, सर्वसामान्य जनता या सगळ्यांशी ही चार क्षेत्रं निगडित आहेत. तसंच चित्रपट आणि शिक्षण ही आपली बलस्थानं आहेत आणि वाहतूक/क्रीडा यात आपण कमकुवत आहोत” हे कारण वाचल्यावर SWOT Analysis चा पगडा असणारा हा लेखक कॉर्पोरेट मॅनेजमेंटमध्ये वीस वर्षं आहे हे जाणवतंच.. !
यापैकी चित्रपटक्षेत्राबाबत लिहिताना “भारतीय चित्रपट जगभर पोचला आहे. आता भारतात फिल्म इंडस्ट्री हे एक स्वतंत्र राज्यच आहे. पण भारतातल्या चित्रपटांबद्दल मेलोड्रामा, रंगांची, नृत्याची आणि गाण्यांची उधळण असा दृष्टिकोन जगात दिसतो. विशिष्ट राजकीय दृष्टिकोन किंवा तत्वज्ञान मांडायला हे चित्रपट कमी पडले आहेत. २०१३ साली भारतीय चित्रपटांना १०० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं चित्रपटांचा दर्जा कसा सुधारता येईल वगैरे चर्चाही कुठेच झाल्या नाहीत. इतकंच काय तर हॉलिवूडशी साधर्म्य सांगणारा “बॉलिवूड” हा शब्द आपण वापरतो त्याबद्दल अभिताभ बच्चननंही नाराजी दर्शवली होती. पण तिथेही आपण “चलता है.. बॉलिवूड म्हणलं तर काय बिघडलं.. असाच सूर लावतो” अशी उदाहरणं लेखकानं दिली आहेत.
“चलता है.. अॅटिट्यूडमधून बाहेर पडण्यासाठी काय करता येईल? याला पर्याय काय असू शकेल” याबद्दल पुस्तकात शेवटी एक प्रकरण आहे हे स्वागतार्हच आहे.. पण ते पर्याय ठोस नाहीत ही या पुस्तकातली मोठी उणीव आहे.. मात्र सबकुछ चलता है.. असं यापुढे म्हणताना हे पुस्तक आठवेल इतकं ते नक्कीच महत्वाचं आहे.
नीलांबरी जोशी
(नीलांबरी जोशी ह्या मराठी साहित्य विश्वातल्या सध्याच्या आघाडीच्या लेखिका आहेत. “मनकल्लोळ भाग १ व २ (विषय – मानसशास्त्र)”, कॉर्पोरेट कल्लोळ (विषय – रंजक उद्योगविश्व आणि कर्मचारी व्यथा), झपूर्जा भाग – १,२,३ (विषय – साहित्य आणि समीक्षा, माहितीपर, मार्गदर्शनपर) तसेच “लाइमलाईट” (विषय – व्यक्तिचित्रण, चरित्र, चित्रपट) हि त्यांची काही गाजलेली पुस्तके आहेत)