“उरणच्या समस्या लवकरच प्राधान्याने सोडवू” – जलसंपदा मंत्री जयंत पाटील
उरण, दि.११(विठ्ठल ममताबादे): “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महात्मा फुले शाहू आंबेडकरवादी विचारांचा पक्ष आहे. मा. शरद पवार साहेबांनी देशातील अनेक प्रश्न सोडविले आहेत. विविध अनेक प्रश्न पक्षाच्या माध्यमातून सोडविले गेले आहेत. भाजप सत्तेत नसल्याने ‘ईडी’ द्वारे महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास द्यायचे चालू आहे. भाजपचे नेते हे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत का?” अशी घणाघाती टीका विरोधकांचा समाचार घेत जयंत पाटील यांनी उरण येथे केले.
राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या भावना-विचार-समस्या जाणून घेण्यासाठी व जनतेच्या प्रलंबित समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्यासाठी उरण मध्ये दिनांक ११/४/२०२२ रोजी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी उरण शहरातील यूईएस हायस्कूल येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमा अंतर्गत जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ लाड, महिला जिल्हाध्यक्ष उमा मुंढे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आदी पदाधिकारी या दौऱ्या निमित्त उरण मध्ये उपस्थित होते.

आपल्या भाषणात जयंत पाटील म्हणाले की उरणवर शरद पवार साहेबांचे विशेष प्रेम आहे. त्यांचे उरणवर विशेष लक्ष आहे. खासदार सुनिल तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील अनेक प्रश्न सोडविले त्यांच्या माध्यमातून उरण मधील प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जातील. भविष्यात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांना योग्य ते स्थान दिले जाईल असे सांगत जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका पदाधिकारी कार्यकर्त्या समोर मांडली.
खासदार सुनिल तटकरे यांनी आपल्या भाषणात उरणकरांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देत पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह उरणच्या जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे जाहीरपणे सांगितले. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात केलेल्या विकासकामांची यावेळी दिली. प्रशांत पाटील, भावना घाणेकर हे उरण-पनवेल मध्ये चांगले काम करीत आहेत. यांच्या माध्यमातून उरण मधील अनेक समस्या सोडविले गेले असल्याचे सांगितले. सीडब्लूसी इमपेक्स पार्क द्रोणागिरी नोड सीएफएस मध्ये राष्ट्रवादी कामगार संघटनेची स्थापना झाली आहे. प्रशांत पाटील, भावना घाणेकर यांनी कामगारांना न्याय मिळवून दिला. त्यांचे प्रश्न सोडविले आहे. असे सांगत त्यांचे कौतुक केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे न्याय मिळाल्याने सीडब्लूसी इमपेक्स पार्क, द्रोणागिरी नोड सीएफएस मधील कामगार प्रतिनिधी विक्रम ठाकूर यांनी आपल्या साथी दारासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. काँग्रेस, शेकाप व मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भावना घाणेकर यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रसिद्ध निवेदक नितेश पंडित यांनी केले.
महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस तथा निरीक्षक नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रशांत पाटील व महिला प्रदेश सरचिटणीस तथा निरीक्षक पनवेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भावना घाणेकर,उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष भार्गव पाटील, तालुकाध्यक्ष मनोज भगत, शहर अध्यक्ष गणेश नलावडे, तालुका महिला अध्यक्ष हेमांगी पाटील, आनंद भिंगार्डे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

