नागरिकांच्या जीवाशी खेळ
उरण, दि.९(विठ्ठल ममताबादे): उरण शहरातील नागरिकांना उरण नगर परिषदे मार्फत पाणीपुरवठा नियमितपणे केला जातो. संपूर्ण उरण शहरात रानसई धरणातून एमआयडीसी च्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी पाणीपुरवठा बंद असतो. त्यामुळे शनिवारी सर्व नागरिक पाण्याची वाट बघत होते. शनिवार दिनांक ९/४/२०२२ रोजी नेहमी प्रमाणे सकाळी ५:३० च्या दरम्यान तसेच इतर ठिकाणी टप्प्या-टप्प्या ने पाणी सोडले असता हे पाणी पूर्णपणे गढूळ होते. प्रत्येक नळाला गढूळ पाणी आल्याने नागरिकांमध्ये खूप मोठया प्रमाणात संताप पसरला. उरण शहरात अनेक नाले गटारे आहेत. कदाचित एखाद्या ठिकाणी पाईप फुटल्याने व नाले गटारातील पाणी त्या पाईपमध्ये गेल्याने दूषित पाणी आले असेल असा अंदाज वर्तविला जात आहे. नाले गटारातील पाण्या प्रमाणे दिसणारे हे पाणी उरण शहरातील प्रत्येक नागरिकांच्या घरात ते दूषित पाणी घरोघरी पोहोचले. या पाण्यामुळे रोगराई पसरणार असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे. याबाबतीत एमआयडीसीच्या अधिकारी वर्गाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. मात्र या घटनेस जबाबदार असणाऱ्या उरण नगर परिषद व एमआयडीसी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व भविष्यात असे कृत्य परत होऊ नये यासाठी संबंधित सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी काळजी घ्यावी अशी मागणी उरण शहरातील जनतेने केली आहे.
