केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन
श्रीनगर, दि. ७ : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे की पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जम्मू काश्मीरमध्ये विकास घडवून शांतता प्रस्थापित करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे आणि यावर्षी लाखो पर्यटकांनी या भागाला दिलेली भेट तसेच जम्मू-काश्मीरमधील जनतेच्या कल्याणासाठी विविध क्षेत्रांमध्ये हजारो कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रक्रियेला झालेली सुरुवात यावरून ते सिद्ध होत आहे. श्रीनगर येथे आज आयोजित वार्ताहर परिषदेदरम्यान ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले की, विद्यमान सरकारच्या कार्यकाळात जम्मू-काश्मीरमध्ये आता सर्वत्र जाणवणाऱ्या शांततामय वातावरणामुळे लाखो पर्यटक या परिसराकडे आकर्षित झाले आहेत आणि ही अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे. यातून येथील पर्यटन व्यवसायातील पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच जम्मू-काश्मीरमधील युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण होणार आहेत.
आठवले म्हणाले की, खासगी क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करून जम्मू-काश्मीरच्या स्थानिक युवकांसाठी अधिकाधिक रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार आहे. खासगी क्षेत्रातील अनेक गुंतवणूकदार जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत आणि या केंद्रशासित प्रदेशाच्या हितासाठी ते हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत असे त्यांनी सांगितले.
जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या अनेक सरकारी योजनांच्या १००% अंमलबजावणीतून, केंद्र सरकार जम्मू-काश्मीरमधील जनतेला गृह निर्माण, उपजीविका इत्यादी सर्व पातळ्यांवर सामाजिक स्थैर्य देण्यासाठी खंबीरपणे पावले उचलत आहे या सत्याचीच साक्ष मिळते आहे असे देखील केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
