राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था उत्तम असून ती अस्थिर असल्याचं भासवलं जात असल्याचं स्पष्टीकरण – दिलीप वळसे पाटील
मुंबई, दि.२३: राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था उत्तम असून ती अस्थिर असल्याचं भासवलं जात आहे, आणि या माध्यमातून राज्याची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरु आहे असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
एखाद्या ठिकाणी अनुचित घटना घडल्यास त्यावरून संपूर्ण राज्यात कायदा सुव्यवस्था नाही हा निष्कर्ष काढणं अनुचित आहे, असं ते म्हणाले. हिंदुत्व हा दोन पक्षातला विषय आहे, असं सांगून आपण यावर बोलणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
सामाजिक तेढ निर्माण करायचा आणि कायद्याच्या विरोधात वर्तन करण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस योग्य ती कारवाई करतील असं ते म्हणाले. पोलिसांवर राज्यसरकार दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. भोंग्यांबाबत येत्या २५ तारखेला सर्वपक्षीय बैठक बोलावणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं.
