पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची लोकसभेत माहिती
नियमित ताज्या माहितीसह, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय हवामान विभाग (आयएमडी), पाच दिवस आधी ढगांच्या मेघगर्जनेसह वादळ आणि संबंधित हवामानाचा अंदाज आणि इशारे जारी करत असते.
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या स्वायत्त संशोधन संस्थेने, आकाशातून वीज कोसळण्यासंदर्भातील शोध आणि ही ठिकाणे अत्यंत अचूकतेने निश्चित करण्यासाठी देशात ८३ ठिकाणी वीज कोसळण्यासंबंधित नेटवर्कची स्थापना केली आली आहे. आयआयटीएम येथे असलेल्या या नेटवर्कचा सेंट्रल प्रोसेसर, नेटवर्कवरून मिळालेला संकेत प्राप्त करतो आणि त्यावर प्रक्रिया करतो आणि ५०० मीटर पेक्षा कमी अचूकतेसह वीज कोसळण्याचे स्थान ओळखतो. या नेटवर्कमधील अंतिम माहिती ही भारतीय हवामान विभाग आणि विविध राज्य सरकारांना सामायिक केली जाते आणि याचा उपयोग तत्काळ अंदाज वर्तवण्यासाठी केला जातो.
भारतीय हवामान विभागामधील राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राकडून, हे अंदाज आणि इशारे हवामानशास्त्रीय उपविभागीय स्तरावर दिले जातात तर तर राज्य हवामान केंद्रे ते जिल्हा स्तरावर जारी करतात. याव्यतिरिक्त, मेघगर्जनेसह वादळ आणि संबंधित आपत्कालीन हवामान घटनांचा तात्काळ अंदाज (दर ३ तासांनी पुढील ३ तासांसाठी जारी करण्यात आलेला अंदाज) राज्य हवामान केंद्रांच्या माध्यमातून स्थान/जिल्हा स्तरावर दिला जातो. सध्या ही सुविधा सर्व जिल्ह्यांमध्ये आणि देशभरातील सुमारे १०८४ केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
२०२० मध्ये, आयआयटीएम-पुणे द्वारे आकाशातील वीजेसंदर्भात माहिती देणारे दामिनी अॅप विकसित करण्यात आले. हे अॅप भारतात आकाशात चमकणाऱ्या विजेच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहे. आणि हे अॅप जीपीएस अधिसूचनेद्वारे २० किमी ते ४० किमी या कक्षेमध्ये वीज कोसळण्याची शक्यता असलेल्या व्यक्तीला दक्षतेचा इशारा देते. वीज कोसळण्याची शक्यता असलेल्या भागात सूचना, खबरदारीसंदर्भातील विस्तृत तपशील या मोबाईल अॅपमध्ये दिला आहे.हे अॅप आगामी ४० मिनिटांसाठी वैध राहणारा कोणत्याही ठिकाणचा वीज कोसळण्याचा इशारा देखील देते. भारतात ५ लाखांहून अधिक लोकांनी दामिनी अॅपचे डाउनलोड केले आहे.
या व्यतिरिक्त, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) संबंधित समस्यांचे निराकरण करण्याच्या अनुषंगाने प्रभावी उपाययोजना केल्या आहेत.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने २०१८-२०१९ मध्ये विजांच्या कडकडाट/मेघगर्जनेसह वादळ आणि जोरदार वारे यांच्या संदर्भात कृती आराखड्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून ती सर्व राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांना पाठवली आहेत आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहेत.
याव्यतिरिक्त, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने खालील उपक्रम हाती घेतले आहेत.
- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आवश्यक कार्यवाही करण्यासाठी राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांना मेघगर्जनेसह वादळ आणि विजांच्या संदर्भात ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ याबाबत विशिष्ट सूचना जारी केल्या आहेत
- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सर्वात जास्त प्रभावित राज्यांसह वादळ आणि विजांच्या संदर्भात सज्जता आणि समस्यां निराकरण उपायांचा आढावा घेतला.
- मेघगर्जनेसह वादळ आणि विजांच्या संदर्भात लवकर इशारा प्रसारित करण्यासाठी नियम विकसित करणे,
- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मेघगर्जनेसह वादळ आणि विजांच्या संबंधात टीवीसी, पॉकेट बुक्स यासारख्या आयईसी सामग्रीच्या माध्यमातून “काय करावे” आणि ”काय करू नये” यासंदर्भात ध्वनी चित्र तयार केले आहे.
- दूरदर्शनवरील ‘आपदा का सामना’ या कार्यक्रमावर विशेष पॅनेल चर्चा (टीव्हीवर चर्चा )
- दूरदर्शन आणि आकाशवाणी -राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने टीव्ही (दूरदर्शन) आणि रेडिओ (आकाशवाणी) च्या माध्यमातून एप्रिल २०२१ मध्ये ईशान्येकडील राज्ये आणि पश्चिम बंगालसह आपत्ती प्रवण राज्यांमध्ये ‘मेघगर्जनेसह वादळ आणि वीज ‘ यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी मोहीम राबवली आहे
- मेघगर्जनेसह वादळ आणि विजांच्या कडकडाटासंदर्भात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून समाजमाध्यमांवरही मोहीम राबवली जात आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या समाजमाध्यम मंचावरून “काय करावे” आणि “काय करू नये” हे सामायिक केले जात आहे. आणि ट्विटर आणि फेसबुकवर सतत चित्रफिती पोस्ट केल्या जात आहेत
विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
