नवी मुंबई ९५ गावं नैना व इतर प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची बैठक संपन्न
लॉजिस्टि्क पार्कला जमीन न देण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार
उरण, दि.५(विठ्ठल ममताबादे): सिडकोने उरण तालुक्यातील बेलोंडेखार परिसरातील आठ गावातील ७५० एकर जमिनी लॉजिस्टिक् पार्क साठी शेतकऱ्यांचा विरोध असताना एमआरटीपी ॲक्ट नुसार अधिसूचित केल्या आहेत.
या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी सहमति द्यावी यासाठी सिडकोने एकतर्फी शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत त्याच बरोबर कोणताही करार मदार न करता सूनवण्या ठेवल्या आहेत.
या प्रकल्पात सहभागी होणाऱ्या भूमिपुत्रांना कोणताही भरीव आर्थिक मोबदला मिळणार नाही, तसेच ह्या याजनेत सहभागी होणाऱ्या भूमिपुत्रांना न्यायालयात याचिका दाखल करता येणार नाही तसेच कोणताही रोजगाराचा हक्क सांगता येणार नाही असा जाचक करारनामा निति भ्रष्ट सिडकोच्या सोबत करावा लागणार आहे. भारतीय राज्य घटनेने नागरिकांना दिलेल्या अधिकारावर बेकायदेशीररित्या गदा आणण्याचा प्रयत्न सिडको मार्फत करण्यात येत आहे.
सिडकोच्या लॉजिस्टिक्स पार्क मुळे येथील भूमिपुत्रांना आपल्या गावाचा त्याग करावा लागणार आहे व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधीत भूमिपुत्रांची आज जी आवस्था झाली आहे तशी या आठ गावातील बांधवांची होणार असल्याने या प्रकल्पास तीव्र विरोध होत आहे.
हा प्रकल्प कर्नाळा पक्षी अभयारण्य प्रकल्पाच्या बफर झोन मध्ये येत असून प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास होऊन समतोल बिघडणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक ती केंद्रीय पर्यावरण विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही.
दिनांक ४ जुलै रोजी या प्रकल्पास हद्दपार करण्यासाठी येथील भूमिपुत्रांनी जांभूळ पाडा येथे कोविड १९ नियमांचे पालन करून ॲड. सुरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सिडको मार्फत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पास जमीन न देण्याची एकमुखी घोषणा ॲड. सुरेश ठाकूर यांनी उपस्थित भूमिपुत्रांना समोर जाहिररित्या मांडली असून सर्वांनी त्यास संमती दिली आहे.
तसेच या प्रकल्पा विरोधात लवकरच जाहिर आंदोलन सुरू करण्यात येईल अशी घोषणा ॲड. सुरेश ठाकूर यांनी केली.
सिडकोस जर हा प्रकल्प अत्यावशक असल्यास त्यांनी शेतकऱ्यांचा सुपीक जमिनी न घेता. रिलायन्स सेझ साठी संपादित व वीस वर्षे पडीक असलेली जमीन ताब्यात घ्यावी अशी भूमिका सुधाकर पाटील यांनी मांडली.
या सभेस संतोष पवार, संजय ठाकूर, रमाकांत पाटील, गुरुनाथ पाटील, रमन कासकर, रुपेश पाटील, राज पाटील, रा. बा. म्हात्रे, पी. सी. मढवी, प्रा. राजेंद्र मढवी, ॲड मनोज म्हात्रे, सरपंच मुंबईकर, पंकज ठाकूर आदी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
