२३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या काळात अहमदनगर येथे होणार अग्निवीर भर्ती मेळावा
अहमदनगर, दि. २२ : पुणे येथील भर्ती कार्यालयाच्या अधिपत्याखाली, अहमदनगर येथील राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात येत्या २३ ऑगस्ट पासून ११ सप्टेंबर पर्यंत अग्निवीर भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल आणि अग्निवीर ट्रेड्समन श्रेणींकरता मोठ्या प्रमाणात म्हणजे सुमारे ६८,००० उमेदवारांची नोंदणी झाली आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र जारी करण्यात आली असून आगामी भरती मेळाव्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
राहुरी इथे होणाऱ्या या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाकरता अहमदनगरचे जिल्हा प्रशासन आणि स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांनी पूर्ण सहकार्य केले आहे. उमेदवारांच्या भरती प्रक्रियेसाठी व्यावसायिक पद्धतीने पायाभूत सुविधा आणि एकूण मांडणी केली आहे. उमेदवारांसाठी भोजन, पेयजल आणि विश्रांतीची सोय देखील करण्यात आली आहे.
भरती मेळाव्यासाठी दररोज ५,००० उमेदवार येण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. यामध्ये १.६ किमी धावणे, शारीरिक तंदुरुस्ती चाचण्या, शारीरिक मोजमाप चाचण्या आणि वैद्यकीय चाचण्यांचा समावेश असेल. राहुरी येथे वैद्यकीय तपासणीसाठी लष्कराच्या डॉक्टरांचे एक समर्पित पथक देखील तैनात करण्यात आले आहे. मेळाव्याच्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना सर्व संबंधित कागदपत्रे बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
